POLITICAL UPDATE : पेगाससवरून राजकारण तापलं, राज्यातील 5 अधिकारी गेले होते इस्त्राईलला
पेगासस हे सॉफ्टवेअर इस्त्राईलची सायबर सुरक्षा कंपनी एनएसओने बनवले आहे. बांगलादेशसोबत अनेक देशांनी पेगासस सॉफ्टवेअर खरेदीदेखील केले आहे.

political update : पेगासस हे सॉफ्टवेअर इस्त्राईलची सायबर सुरक्षा कंपनी एनएसओने बनवले आहे. बांगलादेशसोबत अनेक देशांनी पेगासस सॉफ्टवेअर खरेदीदेखील केले आहे. अशी माहिती आहे की भारत सरकारनेही यामध्ये सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही याविषयी अनेकदा वाद देखील झाले होते.
मेक्सिकोपासून ते सौदी अरेबियाच्या सरकारापर्यंत, त्याच्या वापराबद्दल अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. आणि या फोन टँपिंग सॉफ्टवेअर बाबत महाराष्ट्र सरकारमध्येही अनेक गोंधळ पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील काही अधिकारी इस्रायलला गेले असल्याचा दावादेखील आता केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात नेमकं काय सुरु आहे, हे पाहाणे गरजेचे आहे.
2019 महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होत होते, यादरम्यान महाराष्ट्रातील पाच अधिकारी सोशल मीडियाचे प्रशिक्षण घेण्यासाठी इस्राईलला गेले होते. मात्र अधिकाऱ्यांनी इस्राईलला जाण्यापूर्वी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. ही माहिती आता समोर आल्यानंतर सर्व ठिकाणी असंतोष निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पेगासस बरोबर या अधिकाऱ्यांचा नक्की काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे.
या सर्व बाबींची दखल घेऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. त्या अहवालातून नक्की कोणत्या बाबी समोर येतील याची उत्सुकता राजकीय वर्तुळात सर्वांनाच आहे. मात्र ठाकरे सरकारने मागवलेल्या अहवालामुळे हे पाच अधिकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
पेगासस सॉफ्टवेअरद्वारे देशात हेरगिरी करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यात आता महाराष्ट्रातील काही नेत्यांचीही या पेगागसद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोनही टॅप करण्यात आल्याचं सांगितलं आहे. आम्ही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करत असताना सरकार बनविण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या सर्वांचे फोन टॅप केल्याचा दावा राऊत यांनी राज्यसभेत केल्याने गोंधळ उडाला आहे. त्यामुळे पेगाससच्या संबंधीत अनेक गोष्टी समोर येत असताना मोदी सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत.
त्यात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नवीन माहिती समोर आणून या प्रकरणाला नवे वळण दिले. राज्यात फडणवीस सरकारच्या वेळी पेगासस सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रातही हेरगिरी व फोन टॅपिंग झाले का? असा प्रश्न विचारून याच्या चौकशीची मागणी सचिन सावंत यांनी केली. पेगासस कांड महाराष्ट्रातही झाले का? याची चौकशी महाविकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून करण्यात आलेले अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे.
फडणवीस साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी शेती आणि शेती तंत्रज्ञान शिकण्यासाठी इस्त्रायल ला गेले होते😄.
माहितीसाठी- इस्त्रायल दौऱ्याचा विषय “To study new trends in
Government outreach programs and new ways of
utilising social- web media” होता pic.twitter.com/kzOckfZs8C— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 20, 2021
परंतु पेगासस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्याही येत होत्या. कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का?, याची चौकशी करण्याची नक्कीच गरज आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
कोणाची परवानगी का घेतली नाही? डीजीआयपीआरचे अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्रायलला गेले? कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतले? परत येऊन अहवाल दिला का? पेगाससशी यांचा संबंध आहे का? असे विविध प्रश्न आता उपस्थित होत आहे.