Ratnagiri-Chiplun Update : कोकणात भारतीय नौदलाचे जवान तैनात, असं असेल रेस्क्यू ऑपरेशन
Ratnagiri-Chiplun Update : अतिवृष्टी झाल्यामुळे चिपळूण, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचले आहे.

Ratnagiri-Chiplun Update : अतिवृष्टी झाल्यामुळे चिपळूण, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचले आहे. पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या बचावासाठी आता नौदल, सैन्य दलाच्या तूकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने त्या जिल्ह्यांची माहिती घेत आहेत.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर अतिवृष्टीमुळे कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्हयांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हयांमधील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकडया त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत.
पुरपरिस्थितीतील मदत आणि बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच पुणे विभागातील संभाव्य पुरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्हयांमध्येही एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून हेलिकॉप्टर मार्फत मदत आणि बचावकार्य करण्यात येत आहे.
एनडीआरएफच्या 2 तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाल्या असून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी 25 जवानांची 2 पथके प्रत्येक ठिकाणी सज्ज झाली आहेत.