राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार? हिंदुत्वाच्या वक्तव्यावरून वातावरण तापलं
पोलिसांमार्फत एकांतात कानोसा घ्या, काय काय माहीती मिळेल अशी माहिती वंचितच्या शिष्टमंडळाने नांगरे पाटील यांना दिली.

Raj Thackeray Speech : मराठी अस्मिता, मराठी पाट्या, भाषा तसेच प्रादेशिक घुसखोरी या मुद्द्यांना बगल देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या काही दिवसात हिंदु-मुस्लिम विवादाकडे आपला अजेंडा फिरवला आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. दोन समाजात संदेहाचे वातावरण निर्माण करुन तेढ वाढवणारे वक्तव्य झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान आणि महासचिव आनंद जाधव यांच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली आणि राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत तक्रार दाखल केली आहे.
शिवाजीपार्कयेथे 3 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात झोपडपट्टीतील मदरशांबाबतीत अतिशय गंभीर वक्तव्य केले. “झोपडपट्टीतील मदरशा आणि मस्जिदीमध्ये समाज विघातक गोष्टी घडतात, असे पोलीस खाजगीत सांगतात, या मशीदी व मदरशांवर धाडी टाका काय काय सापडेल ते पाहून धडकी बसेल” असे वक्तव्य ठाकरेंनी केले होते.
या वक्तव्याची दखल घेऊन पोलीस विभागाने रितसर चौकशी करावी, काही गैरकृत्य आढळून आले तर कडक कारवाई करावी, परंतु जर यात काही तथ्य आढळले नाही तर राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये जे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि धार्मिक तेढ निर्माण करून जे दंगे घडवण्याचा कट रचण्याचा प्रयत्न दिसून येत आहेत, त्यानुसार राज ठाकरेंवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची तक्रार वंचितकडून करण्यात आली आहे.